top of page

श्रीसमर्थ रामदासकृत मनाचे श्लोक

1-10

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

1-10

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।

जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

 

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

पुढे वैखरी राम आधी वदावा॥

सदाचार हा थोर सांडूं नये तो।

जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

 

मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना धर्मता नीति सोडूं नको हो।

मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥

 

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥

मना कल्पना ते नको वीषयांची।

विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥

 

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मना लोभ हा अंगिकारू।

नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

 

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।

मना बोलणे नीच सोशीत जावें॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।

मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥

 

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

 

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥

 

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।

दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥

देहेदु:ख ते सूख मानीत जावे।

विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥

11-20

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

11-20

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

 

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।

मना सर्वथा शोक चिंता नको रे॥

विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।

विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥

 

मना सांग पां रावणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

 

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।

परी शेवटीं काळमूखीं निमाला॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।

कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥

 

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।

जितां बोलती सर्वही जीव मी मी॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती।

अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।

अकस्मात तोही पुढे जात आहे॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

 

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥

 

मना राघवेंवीण आशा नको रे।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥

जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।

तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥

 

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।

मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥

मना सत्य ते सत्य वाचे वदावे।

मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥

 

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।

नको रे मना यातना तेचि मोठी॥

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

21-30

मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥

मना यातना थोर हे गर्भवासीं।

मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

 

मना सज्जना हीत माझें करावें।

रघुनायका दृढ चित्ती धरावें॥

महाराज तो स्वामि वायुसुताचा।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

 

न बोलें मना राघवेवीण कांहीं।

जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥

घडिने घडी काळ आयुष्य नेतो।

देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

 

रघुनायकावीण वांया शिणावे।

जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।

अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

 

मना वीट मानूं नको बोलण्याचा।

पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥

सुखाची घडी लोटतां सूख आहे।

पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

 

देहेरक्षणाकारणें यत्न केला।

परी शेवटीं काळ घेउन गेला॥

करीं रे मना भक्ति या राघवाची।

पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

 

भवाच्या भये काय भीतोस लंडी।

धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

 

दिनानाथ हा राम कोदंडधारी।

पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

 

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।

वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥

पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

 

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।

असा सर्व भुमंडळी कोण आहे॥

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

21-30

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

31-40

महासंकटी सोडिले देव जेणें।

प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

 

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।

पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥

जया वर्णितां शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

 

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।

शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥

चिरंजीव केले जनी दास दोन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

 

उपेक्षी कदा रामरुपी असेना।

जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥

शिरी भार वाहेन बोले पुराणीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

 

असे हो जया अंतरी भाव जैसा।

वसे हो तया अंतरी देव तैसा॥

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

 

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।

कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

 

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।

उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

 

मना प्रार्थना तूजला एक आहे।

रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

 

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।

जयाचेनि योगें समाधान बाणे॥

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

 

मना पाविजे सर्वही सूख जेथे।

अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥

विविकें कुडी कल्पना पालटिजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥

31-40

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

41-50

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।

शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥

विचारें बरें अंतरा बोधवीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥

 

बहुतांपरी हेंचि आतां धरावें।

रघूनायका आपुलेसे करावें॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥

 

मना सज्जना एक जीवीं धरावें।

जनी आपुलें हीत तूवां करावें॥

रघूनायकावीण बोलो नको हो।

सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

 

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।

कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।

सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

 

जयाचेनि संगे समाधान भंगे।

अहंता अकस्मात येऊनि लागे॥

तये संगतीची जनीं कोण गोडी।

जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥

 

मना जे घडी राघवेवीण गेली।

जनीं आपुली ते तुवां हानि केली॥

रघूनायकावीण तो शीण आहे।

जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥

 

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।

जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥

 

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

सदा रामनामें वदे नित्य साचा॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥

 

सदा बोलण्यासारिखे चालताहे।

अनेकीं सदा एक देवासि पाहे॥

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥

 

नसे अंतरी काम नानाविकारी।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥

निवाला मनीं लेश नाही तमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥

41-50

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

51-60

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।

प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥

 

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

 

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥

 

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥

 

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

 

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।

स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥

तया अंतरी क्रोध संताप कैंचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥

 

जगीं होइजे धन्य या रामनामे।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥

उदासीनता तत्त्वता सार आहे।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

 

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

 

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥

मनीं कामना राम नाही जयाला।

अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥

 

मना राम कल्पतरु कामधेनु।

निधी सार चिंतामणी काय वानूं॥

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।

तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥

51-60
61-70

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

61-70

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।

तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥

जनी सज्जनी वाद हा वाढवावा।

पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥

 

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।

बळें अंतरीं शोक संताप ठेला॥

सुखानंद आनंद भेदें बुडाला।

मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥

 

घरी कामधेनू पुढें ताक मागें।

हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥

करी सार चिंतामणी काचखंडे।

तया मागतां देत आहे उदंडे॥६३॥

 

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।

अती काम त्या राम चित्ती वसेना॥

अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।

अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥

 

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।

अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥

धरीं रे मना आदरें प्रीति रामी।

नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥

 

नव्हे सार संसार हा घोर आहे।

मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥

जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।

करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥

 

घनश्याम हा राम लावण्यरुपी।

महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥

करी संकटीं सेवकांचा कुडावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥

 

बळें आगळा राम कोदंडधारी।

महाकाळ विक्राळ तोही थरारी॥

पुढे मानवा किंकरा कोण केवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥

 

सुखानंदकारी निवारी भयातें।

जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥

विवेके त्यजावा अनाचार हेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६९॥

 

सदा रामनामे वदा पुर्णकामें।

कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥

मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७०॥

71-80

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

71-80

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती॥

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥

 

न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।

मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥

महाघोर संसारशत्रु जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥

 

देहेदंडणेचे महादु:ख आहे।

महादु:ख तें नाम घेता न राहे॥

सदाशीव चिंतीतसे देवदेवा।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥

 

बहुतांपरी संकटे साधनांची।

व्रते दान उद्यापने ती धनाची॥

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥

 

समस्तामधे सार साचार आहे।

कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥

 

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥

म्हणे दास विश्वास नामी धरावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।

 

करी काम निष्काम या राघवाचे।

करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥

करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।

हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥

 

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।

तया पामरा बाधिजे सर्व कांही॥

महाराज तो स्वामि कैवल्यदाता।

वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥

 

मना पावना भावना राघवाची।

धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥

भवाची जिवा मानवा भूलि ठेली।

नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥

 

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।

तरा दुस्तरा त्या परा सागराते॥

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।

करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥

81-90

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

81-90

मना मत्सरे नाम सांडूं नको हो।

अती आदरे हा निजध्यास राहो॥

समस्तांमधे नाम हे सार आहे।

दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥

 

बहु नाम या रामनामी तुळेना।

अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥

विषा औषधा घेतले पार्वतीशे।

जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥

 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।

उमेसी अती आदरें गूण गातो॥

बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।

परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥

 

विठोने शिरी वाहिला देवराणा।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।

जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥

 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।

जपू नेमिला नेम गौरीहराचा॥

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।

तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥

 

मुखी राम विश्राम तेथेचि आहे।

सदानंद आनंद सेवोनि आहे॥

तयावीण तो शीण संदेहकारी।

निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

 

मुखी राम त्या काम बाधुं शकेना।

गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥

हरीभक्त तो शक्त कामास भारी।

जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥

 

बहू चांगले नाम या राघवाचे।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।

जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥

 

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥

हरीचिंतने अन्न सेवीत जावे।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥

 

न ये राम वाणी तया थोर हाणी।

जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥

हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥

91-100

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

91-100

नको वीट मानूं रघुनायकाचा।

अती आदरे बोलिजे राम वाचा॥

न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।

करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥

 

अती आदरें सर्वही नामघोषे।

गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥

हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।

विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥

 

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।

तया लागली तत्त्वता सार चिंता॥

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।

मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥

 

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।

निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥

जपे आदरें पार्वती विश्वमाता।

म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥

 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे।

तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥

शुकाकारणे कुंटणी राम वाणी।

मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥

 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।

जपे रामनामावळी नित्यकाळीं॥

पिता पापरुपी तया देखवेना।

जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥

 

मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।

अहंतागुणे यातना ते फुकाची॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।

म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥

 

हरीनाम नेमस्त पाषाण तारी।

बहु तारीले मानवी देहधारी॥

तया रामनामीं सदा जो विकल्पी।

वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥

 

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।

तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥

मुखे रामनामावळी नित्य काळीं।

जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥

 

यथासांग रे कर्म तेंहि घडेना।

घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥

दया पाहतां सर्व भुतीं असेना।

फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥

Jai Sri Ram

bottom of page